Akola,Maharashtra,India
पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात
शिक्षण हक्क निकषाला पोहोचणार बाधा : डॉ. बोर्डे

अकोला : पटसंख्येच्या निकषावरील संचमान्यतेमुळे असंख्य शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. शिक्षकाविना शाळा हे धोरण अन्यायकारक ठरत असल्याची भूमिका विज्युक्टाने मांडली आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक गरजेचे असून त्या दृष्टीने निर्णय घेण्याची मागणी विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ.अविनाश बोर्डे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.
तुकडी निकषाऐवजी विद्यार्थी संख्येच्या आधारावर कार्यभार गणना करतांना त्यासाठीचे प्रचलित सर्व निकष व शासन आदेश अधिक्रमित करून १५ मार्च २०२४ च्या शासन आदेशात दिलेल्या पटसंखेच्या निकषानुसार संचमान्यता केली जात आहे. २००९ च्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची पदे भरली जात होती.
मात्र, शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या आदेशानुसार त्यात बदल झाल्याने शिक्षण हक्क कायद्यातील निकष सुद्धा बाधित होत आहेत. यामुळे अनेक शाळा एकच किंवा शुन्य शिक्षकी होतील. ४० च्याऐवजी ३९ विद्यार्थी संख्या झाल्यास शुन्य शिक्षक अशी अवस्था निर्माण होईल. ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकाविना होतील.
राज्यात मोफत शिक्षण घेणाऱ्या शहरी तथा ग्रामीण शेतकरी मुलांना शिक्षकाशिवाय शिक्षण घ्यावे लागेल. ही बाब त्यांना शिक्षणापासून वंचित करणारी असून त्यांच्यावर अन्याय करणारी आहे, असा आरोप विज्युक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे यांनी केला. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक असावेत, याबाबत तातडीने निर्णय व्हावा, अशी आग्रही मागणी त्यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
दरम्यान, उर्वरित वर्गाच्या परीक्षा मुल्यमापन व निकाल हे काम सुद्धा आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांची समायोजन प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक पुणे यांना विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
परीक्षा कार्यात शिक्षक व्यस्त; समायोजन प्रक्रिया थांबवा
२०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची जिल्हास्तरावर समायोजनाची कार्यवाही ३ मार्चपर्यंत, तर २५ मार्चपर्यंत विभाग स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश संचालकांनी ४ फेब्रुवारीच्या पत्रान्वये दिले आहेत. राज्यात १० फेब्रुवारीपासून मंडळाच्या लेखी परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा देखील सुरू आहेत. या सोबतच शिक्षकांना मंडळाच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम विहीत वेळेत पूर्ण करावे लागेल.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.