Satara,Maharashtra,India
साताऱ्यात जिल्हा परिषदेची शाळा पावसाने उध्वस्त
सज्जनगड जवळील कारी येथील घटना

सातारा : परळी, सज्जनगड जवळील कारी ता. जि. सातारा येथील जिल्हा परिषदेची शाळा सततच्या मुसळधार पावसाने आणि प्रचंड वाऱ्याने उध्वस्त झाली. सुदैवाने रविवारी सुट्टी असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पावसामुळे शाळेचा पत्रा पूर्णपणे उचकटून पडला असून भिंतींचेही नुकसान झाले आहे. या पावसात शाळेतील कागदपत्रे, पुस्तके भिजून नुकसान झाले आहे. शाळा शाळा सुरू असताना ही दुर्घटना घडली असती तर जीवितहानीची ही शक्यता होती. या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण इमारतींचा तसेच निकृष्ट बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिकत असून ही शाळा खेळाडुंसाठी विशेषत: मल्लखांब पटूंसाठी प्रसिद्ध आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. विशेषत: सातारा शहराच्या पश्चिम बाजूला असलेल्या दुर्गम कास, परळी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही शाळांना सुट्टी देण्याचे आदेश काढले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र अद्याप पावसाचा जोर कायम असून या दुर्घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत. सातारा जिल्ह्यातील अति प्रचंड पाऊस पडणाऱ्या पश्चिम व दुर्गम भागातील शाळांची तपासणी करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.