Kanpur,UP,India
'फील्डवर काम नको, तर माझ्या शेजारी एसीत बसून बॅटिंग करा'
कलेक्टर साहेबांच्या गुगलीने गुरुजी त्रिफळाचित! मग सटकले आणि क्षेत्ररक्षणास पळाले!

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात वर्ष 2027च्या डिजिटल जनगणनेची तयारी वेगाने सुरू आहे. प्रशासनाने यासाठी कर्मचारी आणि शिक्षकांच्या ड्युटी लावण्यास सुरुवात केली आहे, पण त्याचबरोबर ड्युटी रद्द करण्यासाठी नवनवीन कारणे सांगण्याचे सत्र सुरू झाले आहे.
बुधवारी (15 एप्रिल) कानपूर जिल्हाधिकारी कार्यालयात असाच एक प्रकार घडला, जिथे जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांच्या एका आगळ्यावेगळ्या निर्णयाने एका शिक्षकाचा दृष्टिकोन बदलला, इतकंच नव्हे तर त्यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासाठी एक आदर्श घालून दिला.
जनगणनेची ड्युटी रद्द करण्यासाठी डीएमकडे पोहोचले शिक्षक
जनता दर्शन कार्यक्रमादरम्यान जयप्रकाश शर्मा नावाचे एक साहाय्यक शिक्षक आपली जनगणनेची ड्युटी रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचले. "मी शारीरिकदृष्ट्या अनफिट असून फील्डवर जाऊन काम करू शकत नाही," अशी माहिती त्यांनी दिली. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी चक्क दिव्यांग प्रमाणपत्रही दाखवले आणि या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.
"माझ्या शेजारी बसा आणि लोकांच्या समस्या सोडवा", जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली गुगली
सहसा अशा अर्जांवर अधिकारी कडक शब्दात नकार देतात, पण जिल्हाधिकारी जितेंद्र प्रताप सिंह यांनी वेगळीच युक्ती लढवली. ते शिक्षकाला म्हणाले, "जर तुम्ही फील्डवर जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही इथेच माझ्या शेजारी बसा आणि जी जनता आपल्या समस्या घेऊन येत आहे, त्या ऐकून त्यांच्या समाधानासाठी मला मदत करा."
तक्रारींचा पाऊस पडताच गुरुजींना फुटला घाम!
जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकासाठी आपल्या शेजारीच खुर्ची टाकली. पुढच्याच क्षणी तक्रारदारांची रिघ लागली. कोणाचा जमिनीचा वाद होता, कोणाची पेन्शन रखडली होती, तर कोणी पोलिसांच्या त्रासाला कंटाळले होते. प्रत्येक तक्रारदार आपली समस्या मांडताना भावूक किंवा संतप्त होता. एकामागून एक येणाऱ्या तक्रारी आणि लोकांचा दबाव पाहून शिक्षक जयप्रकाश शर्मा यांची चांगलीच तारांबळ उडाली.
30 मिनिटांतच शिक्षकाचे हृदयपरिवर्तन
अवघ्या 30 मिनिटांत जनसामान्यांच्या तक्रारींचा ओघ झेलताना शिक्षकाला घाम फुटला. त्यांना जाणवले की एसी ऑफिसमध्ये बसून शेकडो लोकांच्या समस्या सोडवणे हे फील्डवर जाऊन जनगणना करण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मानसिक तणावाचे काम आहे. शिक्षक तातडीने खुर्चीवरून उठले आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर हात जोडून उभे राहिले. ते म्हणाले, "साहेब, एकाच वेळी इतक्या समस्या ऐकणे आणि त्यांचे निराकरण करणे अत्यंत कठीण काम आहे. मला आता जनगणनेची ड्युटी करण्यास काहीच हरकत नाही, मी ती जबाबदारी चोख पार पाडीन."
सोशल मीडियावर डीएमच्या स्टाइलची चर्चा
जिल्हाधिकाऱ्यांच्या या 'लाइव्ह टेस्ट'चा परिणाम असा झाला की, ड्युटी रद्द करण्यासाठी रांगेत उभे असलेले इतर कर्मचारी आपले अर्ज खिशात घालून तिथून गुपचूप निघून गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही कठोर शब्दाचा वापर न करता, जबाबदारीची जाणीव करून दिल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.