Nasik,Maharashtra,India
नाशिक महानगर पालिका शाळेतील विद्यार्थी 11 हजारांनी घटले
आहे त्या शाळा बंद करून त्याचा इतर कामांसाठी वापर, शिक्षणमंत्री दादा भुसेंना काळजी लागली

नाशिक : महापालिकेच्या शाळांची पटसंख्या ४० हजारांवरून २९ हजारांपर्यंत खाली येणे, ही भूषणावह बाब नाही. शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामांसाठी देण्याची प्रवृत्ती थांबवावी, अशा कानपिचक्या राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांनी नवीन शाळा, वर्ग प्रस्तावांवर जलदगतीने निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले.
नाशिक महापालिका शिक्षण विभागाची आढावा बैठक शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रारंभी, भुसे यांनी मनपा शाळांतील ज्या विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड झाली, त्यांच्याशी संवाद साधला. प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी मनपा शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सभागृहाला संबोधित करताना शिक्षणमंत्री भुसे यांनी नाशिक महापालिका, शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे नाराजी प्रगट केली. शाळा ही ज्ञानाची मंदिरे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण मंदिरांच्या विकासासाठी पुढाकार घेतो, तसेच शाळांचा विकास करणे ही आपली सर्वोच्च जबाबदारी आहे. मनपा शाळांभोवती अतिक्रमणांचा वेढा पडला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्व अतिक्रमणे हटवावीत, असे भुसे यांनी निर्देश दिले. नाशिक महापालिकेच्या शाळांमधील सुमारे ११ हजारांनी घटलेल्या पटसंख्येवर त्यांनी बोट ठेवले. आगामी काळात ही पटसंख्या पुन्हा ४० हजारांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे त्यांनी सूचित केले. याप्रसंगी उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक आदी उपस्थित होते.
नवीन शाळा, वाढीव वर्ग प्रस्ताव
मंत्री भुसे यांनी मालेगाव तालुक्यातील यशस्वी शालेय उपक्रमांची चित्रफित दाखवून नाशिकमध्येही त्या धर्तीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. राज्याचा आढावा घेताना आपले स्वतःचे घर म्हणजेच नाशिक सुस्थितीत असणे आवश्यक आहे. शाळा बंद करून त्यांच्या इमारती इतर कामांसाठी देण्याची प्रवृत्ती थांबवावी. उलट, येणाऱ्या काळात नगरसेवकांची बैठक घेऊन प्रत्येक शाळेचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. गरजेनुसार नवीन शाळा किंवा वाढीव वर्गांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केल्यास त्यांना एका तासाच्या आत मंजुरी दिली जाईल. पुण्याच्या गर्दरेवाडी येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी ज्याप्रमाणे शाळेचे चित्र बदलले, तसेच प्रयत्न नाशिकमध्येही व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात कपात
शिक्षकांच्या २५ टक्के अशैक्षणिक कामांमध्ये कपात करण्यात आली असून उर्वरित कामांबाबतही शासन विचार करत असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली. पदोन्नती प्रक्रिया राबवून पवित्र पोर्टलसाठी जाहिरात देणे, तारांगण प्रकल्पाचा पूर्ण वापर करणे आणि एकल पालक योजनेचा लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यावर त्यांनी भर दिला. शिक्षण विभागाने बेकायदेशीर बाबी आणि शालेय पोषण आहाराबाबत अत्यंत सतर्क राहून वेळोवेळी शाळा भेटी आयोजित कराव्यात, असेही त्यांनी बजावले.
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.